मराठी व्याकरण प्रकरण – शब्दांच्या शक्ती

शब्दांच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते, तिला शब्दशक्ती असे म्हणतात.

शब्दशक्ती तीन प्रकारची आहे.

१) अभिधा २) व्यंजना ३) लक्षणा


१) अभिधा :

एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व सरळ समाजमान्य एकच अर्थ निघतो (म्हणजे त्या घटकाशी निगडित) हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात. शब्दशः अर्थाला अभिधा म्हणतात, असा अर्थ विश्वकोशात सापडतो. म्हणजेच वाच्यार्थाला अभिधा म्हणतात. शब्द उच्चारल्यावर मूळ वस्तू, पदार्थ डोळ्यासमोर येतो. ही शब्दशक्ती मूळ अर्थाशी संबंधीत असल्याने या शब्दशक्तीला ‘प्राथमिक शक्ती’ असेही म्हणतात.

उदा.

१) मी एक लांडगा पाहिला.

२) मी ज्ञानेश्वरी वाचली.

३) रस्त्याच्या बाजूला एक घर आहे.

अभिधा शब्दशक्तीचे खालील तीन प्रकार पडतात

१) रुढी २) योग ३) योगरुढी

१) रुढी : या शब्दाला रुढीने मिळालेला फक्त एकच अर्थ असतो. या शब्दाचे अवयव पडत नाहीत तसेच व्युत्पत्तीही सांगता येत नाही. तसेच हे शब्द अभेद्य असतात.

उदा.

१) त्याने हत्ती पाहिला.

२) मी पाय धुतले.

३) बांगड्या सुंदर आहेत.

२) योग : ज्या शब्दाची उगम व व्युत्पत्ती सांगता येते तसेच शब्दाला एकच मूळ अर्थ असतो त्याला योग असे म्हणतात. शक्यतो असे शब्द साधित प्रकारात असतात व त्यांचा मूळ शब्द व प्रत्यय असा विग्रह करता येतो.

उदा.

भारतीय – भारतात राहणारा

लेखक – लेखन करणारा

कुंभार – कुंभ करणारा

मार्गस्थ – मार्गावर असणारा

वरील वाक्यात भारतीय शब्दाला स्वतःचा स्वतंत्र असा एकच अर्थ आहे शिवाय भारत हा मूळ शब्द सुद्धा सांगता येतो.

३) योगरुढी : ज्या शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते; परतु याचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात व त्यातून रुढीने एकच वेगळा विशिष्ट अर्थ घेतला जातो त्यास योगरुढ म्हणतात. जसे आकाशात गमण करणाऱ्या बहुतेक घटकांना खग असे म्हणतात; परंतु रुढीने मात्र पक्षी एवढाच अर्थ घेतला जातो.

उदा.

खग – आकाशात गमन करणारा

पक्षी पंकज – चिखरात उगवणारे – कमळ


२) व्यंजना :

मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. एका शब्दातून अनेक अर्थ प्रकट होऊ शकतात. या शक्तीद्वारे प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ म्हणतात. मूळ अर्थाचा उपयोग दुसऱ्या अर्थानेसुध्दा केला जातो. व्यंग दाखविणे, नावे ठेवणे तसेच द्विअर्थाने वापरलेले शब्द यात मोडतात. काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी ही शब्दशक्ती वापरतात. म्हणजे एकच शब्द अनेक अर्थाने वापरल्यास ती शब्दशक्ती व्यंजना असते. ध्वन्यार्थ हे या शब्दशक्तीचे वैशिष्ट्य आहे.

उदा. सूर्य अस्ताला गेला. या वाक्यात व्यक्तीनुसार वेगवेगळे अर्थ घेतले जाऊ शकतात.

१) गुरे घरी घेऊन जाण्याची वेळ आली.

२) अभ्यासाची वेळ झाली.

३) काम संपविण्याची वेळ झाली.

४) चोरी करण्यासाठी पूर्व तयारीची वेळ झाली.

व्यंजना शब्दशक्तीचे खालील दोन प्रकार पडतात

१) शाब्दी व्यंजना २) अर्थी व्यंजना

१) शाब्दी व्यंजना (श्लेषमूल व्यंजना) : एकाच शब्दाचे दोन अर्थ होतात.

उदा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी (वधू) शिशुपाल नवरा मी न-वरी (लग्न न करणे)

२) अर्थी व्यंजना : या प्रकारात वाक्याच्या मूळ अर्थाबरोबर वेगळा अर्थसुद्धा व्यक्त होतो..

उदा. घड्याळाने पाचचे ठोके दिले.

वरील वाक्यात पाच वाजने हा मूळ अर्थ आहे. याशिवाय चहाची वेळ झाली, मुलाला शाळेतून आणण्याची वेळ झाली, शाळा सुटण्याची वेळ झाली, काम संपविण्याची वेळ झाली. असे वेगवेगळे अर्थ व्यक्ती परत्वे घेतले जातात.

उदा.

१) त्याने राम म्हटले.

२) लाथ मारेल तिथे पाणी काढील.


३) लक्षणा :

ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो ती शब्दशक्ती लक्षणा असते.

उदा. आम्ही ज्वारी खातो. याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता, त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो, त्याला ‘लक्ष्यार्थ‘ म्हणतात.

लक्षणा शब्दशक्तीचे खालील मुख्य दोन प्रकार पडतात

१) निरुढा लक्षणा २) प्रयोजनवती लक्षणा

१) निरुढा लक्षणा : या प्रकारात मूळ अर्थ न घेता वेगळा परंतु रुढीने प्राप्त झालेला अर्थ घेतला जातो.

उदा. १) कोल्हापूर शूर आहे. या वाक्यात शहर शूर नसून तेथील मानसे शूर आहेत हा अर्थ रुढीनुसार घेतला जातो.

२) प्रयोजनवती लक्षणा : या शब्दशक्तीचे खालील दोन प्रकार पडतात.

अ) गौणी लक्षणा : जेव्हा उपमान आणि उपमेय यांच्यातील

गुणसाधर्म्य दर्शविले जाते तेव्हा गौणी लक्षणा ही शब्दशक्ती असते.

उदा. १) चंद्र-मुख पाहूण मन झाले प्रसन्न – दिलेल्या वाक्यात चंद्र व मुख हे वेगळे घटक आहेत. यात मुख उपमेय असून चंद्र हे उपमान आहे. जसे चंद्राला पाहूण मन प्रसन्न होते तसेच मुख पाहूणही मन प्रसन्न होते. येथे गुणाचे साध्यर्म्य आहे.

ब) शुद्धा लक्षणा : या प्रकारात गुणसमानतेशिवाय इतर पद्धतीने लक्षार्थ ग्रहण केला जातो.

उदा. १) भारत क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तानशी जिंकला. – या वाक्यात खेळाडू जिंकले असा अर्थ आहे.

२) यात काही राम नाही.

३) माझी वाट लागली.

४) डोळ्यात पाणी आले.

  • शुद्धा लक्षणा शब्दशक्तीचे खालील तीन उपप्रकार पडतात.

अ) उपादान लक्षणा : या प्रकारात मूळ अर्थाला पूर्ण बाधा येत नाही. वाच्यार्थ लक्षार्थाबरोबर उपस्थित असतो.

उदा. १) मंचावर अनेक पांढऱ्या टोप्या बसल्या आहेत – या वाक्यात पांढऱ्या टोप्या घातलेले लोक असा अर्थ होतो म्हणजेच पांढऱ्या टोप्या हा अर्थसुद्धा उपस्थित आहे.

ब) लक्षण लक्षणा : येथे मूळ अर्थाला पूर्ण बाधा येते व पूर्णतः वेगळाच अर्थ घेतला जातो.

उदा. पोटात कावळे ओरडायला लागले याचा अर्थ पूर्णतः वेगळा ‘भूक लागली’ असा घेतला जातो.

क) सारोपा लक्षणा : एका घटकावर दुसऱ्या घटकाचा आरोप केला जातो.

उदा. सीता गाय आहे. दिलेल्या वाक्यात सीतेवर गाईचा आरोप केला आहे; म्हणजे सीता गाईसारखी गरीब व साधी आहे.


Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र